kamali serial new twist : झी मराठीवरील लोकप्रिय ‘कमळी’ मालिकेतील महानिकालाचा ट्रॅक अखेर प्रेक्षकांसमोर आला असून, गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या उत्कंठेला आता पूर्णविराम मिळाला आहे. कमळीच्या निकालाबाबत सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा रंगली होती. अखेर संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर कमळीने केवळ परीक्षा उत्तीर्णच नाही तर मुंबई विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
गावातून मोठी स्वप्नं घेऊन मुंबईत आलेली कमळी सुरुवातीपासूनच अनेक अडचणींना सामोरी जाताना दिसली. तिच्या यशाच्या मार्गात वारंवार अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न अनिका करत होती. परीक्षेच्या काळातही अनिकाने कमळीचं नुकसान व्हावं यासाठी अनेक डाव आखले. कामिनीची साथ घेत तिने कमळीला मदत मिळू नये याचीही काळजी घेतली होती. मात्र, संकटाच्या काळात अन्नपूर्णा आजी तिच्या मदतीला धावून आली आणि त्यामुळे कमळीला परीक्षा देता आली.
अनिकाला स्वतःच्या यशाचा प्रचंड आत्मविश्वास होता. अंतिम निकालात आपणच अव्वल येणार अशी खात्री तिने मनाशी बांधली होती. पण निकाल लागल्यानंतर चित्र पूर्णपणे बदललं. कमळीने तब्बल 96.40 टक्के गुण मिळवत मुंबई विद्यापीठात पहिला क्रमांक मिळवला. तिच्या या यशामुळे संपूर्ण कॉलेजमध्ये आणि कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. कोल्हापूरातून आलेल्या एका साध्या मुलीने शहरातील मोठ्या कॉलेजमध्ये अव्वल स्थान मिळवल्यामुळे सर्वत्र तिचं कौतुक होत आहे.
मालिकेतील या विशेष प्रसंगी शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते कमळीचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात हृषीची आई नयनताराही उपस्थित होती. कमळीचा वाढता प्रभाव आणि तिचं यश पाहून नयनताराच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसून आली. कारण, हृषी पुन्हा कमळीच्या अधिक जवळ जाईल अशी भीती तिच्या मनात निर्माण झालेली दिसते.
दरम्यान, मालिकेत आणखी एक भावनिक प्रसंगही पाहायला मिळाला. अन्नपूर्णा आजी अधिकमासाचं व्रत पूर्ण करत असताना अचानक तिची तब्येत बिघडते. अशावेळी कमळी तिची काळजी घेत व्रत पूर्ण करण्यात मदत करते. त्यामुळे आजी आणि कमळीमधील गैरसमज दूर होऊन त्यांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा निर्माण झालेला दिसतो.
हे पण वाचा.. फॉरेनची पाटलीण’ फेम गिरीश परदेशीने १० वर्ष अभिनयापासून का घेतला ब्रेक? अभिनेता म्हणाला…
kamali serial new twist
इतकंच नाही तर आगामी भागांमध्ये कमळी आणि हृषीच्या नात्यातही मोठा बदल पाहायला मिळणार आहे. हृषीच्या मनात आधीपासून असलेल्या प्रेमभावना आता कमळीच्या मनातही निर्माण होणार असल्याचं संकेत मालिकेतून मिळत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना लवकरच त्यांच्या प्रेमकथेची नवी सुरुवात पाहायला मिळू शकते.
हे पण वाचा.. मी अभिमानी हिंदू आहे, पण अंधभक्त नाही; शशांक केतकरचं देवाविषयी स्पष्ट मत
आता पुढे अनिका, कामिनी आणि रागिणी कमळीच्या यशानंतर कोणता नवा डाव आखणार? सरोज उर्फ गौरी कमळीसमोर केव्हा येणार? तसेच राजनसमोर सत्य कधी उघड होणार? याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. ‘कमळी’ मालिका दररोज रात्री ९ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित केली जाते.









