झी मराठीवरील लोकप्रिय मालिका Veen Doghatli Hi Tutena सध्या प्रेक्षकांना जबरदस्त ट्विस्ट देत आहे. समर आणि स्वानंदीचं अनपेक्षितरीत्या झालेलं लग्न, त्यानंतर दोघांनीही नव्या नात्याला सुरुवात करण्याचा घेतलेला निर्णय, घरात तयार झालेलं सकारात्मक वातावरण… सगळं काही सुरळीत चाललं होतं. मात्र, या संसारात मल्लिकेची सावली पुन्हा एकदा पडू लागल्याचं नव्या प्रोमोमधून स्पष्ट होते.
कथेप्रमाणे, समर आणि स्वानंदी यांनी त्यांच्या भावंडांना – रोहन आणि अधिराला – एकत्र आणण्यासाठी स्वतःचा संसार सुरू केला. या लग्नात अडथळे आणण्यासाठी मल्लिका आणि अंशुमानने अनेक युक्त्या केल्या; स्वानंदीची आई मंदाकिनी हिच्या लोभी स्वभावाचा फायदा घेत परंपरागत बांगड्या गहाण ठेवण्यापासून ते लग्नात मुद्दाम वाद निर्माण करण्यापर्यंत अनेक गोष्टी घडल्या. तरीही समरने स्वानंदीचा हात सोडला नाही.
मात्र, लग्नानंतरही मल्लिकेची मनःस्थिती तशीच आहे. तिचा उद्देश स्पष्ट आहे—स्वानंदीला घरात प्रत्येक पायरीवर अडचणीत आणणे. नुकत्याच शेअर झालेल्या प्रोमोमधील प्रसंगाने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.
प्रोमोमध्ये, घरातील एका पारंपरिक रितीप्रमाणे नवऱ्याने चूल पेटवायची आणि नवरीने प्रसादाचा शिरा बनवायचा असल्याचं आजी सांगताना दिसते. समर आणि स्वानंदी मिळून हा प्रसाद बनवत असतानाच, मल्लिकेचे कारस्थान सुरू होतं. स्वानंदी साखर आणायला सांगताच, मल्लिका मुद्दाम पिठीसाखरेऐवजी मीठाची बरणी ठेवते आणि आपल्या मुलीला आनंदाने सांगते—“आज प्रसादात मीठ पडणार!”
बरणी आणून देणारी रोहिणी मात्र किचनमध्ये रडताना दिसते. स्वानंदी तिची चौकशी करते तेव्हा ती कबूल करते—“माझ्याकडून चूक झाली… मी साखरेऐवजी मिठाची बरणी दिली.” हे ऐकताच स्वानंदीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. ती बाहेर येते, तर घरातील सगळेजण प्रसाद खायला सुरूवातही करतात. ही घटना समर–स्वानंदीमध्ये नवा वाद निर्माण करणार का? मल्लिकेचा डाव यशस्वी होणार का? Veen Doghatli Hi Tutena मालिकेत पुढे काय घडणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.









