sayali tanvi killedar khar satya tharala tar mag promo : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका “ठरलं तर मग” सध्या अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. गेल्या काही भागांपासून मालिकेत सायली तिच्या आयुष्यातील अनेक गूढ गोष्टींचा शोध घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे आता तिच्यासमोर असं सत्य येणार आहे, ज्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्य बदलून जाणार आहे. नव्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली असून सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा रंगली आहे.
मालिकेच्या कथानकानुसार, सायलीच खरी तन्वी किल्लेदार असल्याचे संकेत आधीपासून दिले जात होते. मात्र एका भीषण अपघातानंतर किल्लेदार कुटुंब पूर्णपणे विखुरलं जातं आणि छोट्या तन्वीचं आयुष्य कायमचं बदलून जातं. त्यानंतर वात्सल्य आश्रमात तिचं संगोपन होतं आणि तिला ‘सायली’ ही नवी ओळख मिळते. दरम्यान, प्रियाचं खरं रूप बबली लोखंडे असल्याचं सत्य समोर आल्यानंतर आता खरी तन्वी नेमकी कोण? हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
सायलीला पूर्णा आजीसाठी खऱ्या तन्वीचा शोध घ्यायचा असतो. याच शोधादरम्यान तिच्यासमोर काही महत्त्वाचे धागेदोरे येऊ लागतात. प्रतिमा आत्या सायलीला छोट्या तन्वीशी संबंधित काही आठवणी सांगताना तिची चित्रकलेची वही दाखवते. त्या वहीतील एक चित्र पाहून सायली पूर्णपणे हादरते. कारण तिने अगदी असंच चित्र बालपणी आश्रमाच्या भिंतीवर काढलेलं असतं.
ही गोष्ट लक्षात येताच सायलीच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. तन्वीने काढलेलं आणि स्वतःने काढलेलं चित्र इतकं सारखं कसं असू शकतं? हा विचार तिचा पाठपुरावा करू लागतो. याच क्षणापासून तिच्या भूतकाळाशी संबंधित मोठं रहस्य उलगडण्यास सुरुवात होणार असल्याचं प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे.
सायलीला आपणच रविराज आणि प्रतिमाची मुलगी तन्वी किल्लेदार आहोत हे सत्य समजल्यानंतर ती कोणता निर्णय घेणार? ती अर्जुनसमोर हे सत्य मांडणार का? याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. सोशल मीडियावरही चाहत्यांनी या प्रोमोवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “आता तरी खरं सत्य समोर येऊ द्या”, “पुन्हा डीएनए टेस्टचा ट्रॅक येणार का?”, “सायलीने अर्जुनला सगळं सांगायला हवं” अशा अनेक कमेंट्स सध्या पाहायला मिळत आहेत.
हे पण वाचा. कमळीसमोर उघड होणार आजोबांच्या निधनाचं सत्य; झी मराठीवरील मालिकेत भावनिक वळण
sayali tanvi killedar khar satya tharala tar mag promo
दरम्यान, मालिकेचा हा विशेष भाग १२ आणि १३ जून रोजी रात्री ८.३० वाजता प्रसारित होणार असून आगामी भागांमध्ये कथानक आणखी भावनिक आणि उत्कंठावर्धक होणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे “ठरलं तर मग” मालिकेतील हा मोठा ट्विस्ट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.
हे पण वाचा.. स्वानंदीचा संताप अनावर! चिंगीच्या गरोदरपणाचं सत्य उघड होताच अंशुमन अडचणीत; समरने दिला अंतिम इशारा









