कोण होतीस तू काय झालीस तू नव्या मालिकेमुळे स्टार प्रवाहच्या मालिका होणार बंद?

कोण होतीस तू काय झालीस तू Kon Hotis Tu Kay Zalis Tu

मराठी टेलिव्हिजनच्या दुनियेत सध्या मोठे हालचाली सुरू आहेत. प्रेक्षकांना नेहमीच नव्या गोष्टींची उत्सुकता असते आणि त्यात जर एखादी नवी मालिका येणार असल्याचं कळालं, तर ही उत्सुकता आणखीनच वाढते. अशीच एक नवीन मालिका ‘ कोण होतीस तू काय झालीस तू ’ लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामुळे मालिकांचे वेळापत्रकही बदलणार आहे आणि काही कार्यक्रमांना अलविदा देखील करावा लागणार आहे.


स्टार प्रवाह नेहमीच वेगळ्या धाटणीच्या कथा सादर करत प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आली आहे. आता त्याच वाटेवर चालत वाहिनीने आणखी एक आशयघन मालिका घेऊन येण्याची तयारी केली आहे. ‘ कोण होतीस तू काय झालीस तू ’ ही नवी मालिका २८ एप्रिलपासून रात्री ८ वाजता प्रसारित होणार असून, तिचं शूटिंगही वेगात सुरू आहे.

या मालिकेत एकदा गाजलेली आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेली जोडी पुन्हा एकदा दिसणार आहे – जयदीप आणि गौरी. ही जोडी साकारत आहेत अभिनेता मंदार जाधव आणि अभिनेत्री गिरीजा प्रभू. त्यांच्या सोबत सुकन्या मोने आणि साक्षी गांधी यांसारखे अनुभवसंपन्न कलाकार देखील या मालिकेत झळकणार आहेत. या मालिकेतून एक वेगळी आणि भावनिक कहाणी उलगडली जाणार आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

कोण होतीस तू काय झालीस तू मुळे नव्या मालिकेमध्ये होणार बदल!


या मालिकेच्या प्रसारणामुळे वाहिनीवर चालू असलेल्या काही कार्यक्रमांमध्ये थोडे बदल होणार आहेत. विशेष म्हणजे, या नव्या मालिकेसाठी कोणतीही जुनी मालिका बंद केली जाणार नाहीये. मात्र, ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘ठरलं तर मग’ या सध्या पाऊणतास प्रसारित होणाऱ्या मालिकांचे वेळेत बदल करण्यात येणार आहेत. या दोन्ही मालिकांचा कालावधी आता पुन्हा अर्धा तास करण्यात येणार आहे.

२८ एप्रिलपासून ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत आणि ‘ठरलं तर मग’ ही मालिका रात्री ८.३० ते ९.०० या वेळेत दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन मालिका ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येईल.


तसेच, विनोदी अभिनेता अमेय वाघ याचा बहुचर्चित कार्यक्रम ‘शिट्टी वाजली रे’ देखील २६ एप्रिलपासून प्रत्येक शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे. त्यामुळे स्टार प्रवाहच्या प्राईम टाईम मध्ये आता मनोरंजनाची जबरदस्त मेजवानी मिळणार आहे. (कोण होतीस तू काय झालीस तू )

Kon Hotis Tu Kay Zalis Tu : कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या टीमचे कोकणात जल्लोषात स्वागत

होऊ दे धिंगाणा कार्यक्रम होणार बंद?


दुसरीकडे, ‘होऊ दे धिंगाणा’ या सिद्धार्थ जाधवच्या कार्यक्रमाचा सध्याचा सिझन मात्र लवकरच संपणार आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेण्याच्या तयारीत असून, त्याच्या जागी नवीन कार्यक्रम किंवा स्पेशल एपिसोड्सचे नियोजन सुरू असल्याचे समजते.

या सर्व घडामोडींमुळे स्टार प्रवाहच्या प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेषतः जयदीप आणि गौरीच्या नव्या रुपातली केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. नवी मालिका, नवे चेहरे आणि जुन्या वेळापत्रकात होणाऱ्या बदलामुळे प्राईम टाइम आणखीनच रंगतदार होणार आहे, हे नक्की!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *