constable manju malika band zali : मराठी टेलिव्हिजनवर गेल्या काही दिवसांत अनेक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. स्टार प्रवाहवरील ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ तसेच शिवानी सुर्वेची ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिका नुकत्याच ऑफ एअर झाल्या होत्या. आता त्याच पंक्तीत ‘सन मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘कॉन्स्टेबल मंजू’ चा समावेश झाला आहे.
१८ मार्च २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ही मालिका अवघ्या दीड वर्षांच्या प्रवासानंतर संपुष्टात आली. इतक्या लवकर पडदा पडेल असं कोणीच अपेक्षित केलं नव्हतं. त्यामुळे मालिकेचे चाहते नाराज झाले असून, सोशल मीडियावर त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
‘कॉन्स्टेबल मंजू’ मध्ये मोनिका राठी आणि विशाल कदम यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यांच्यासोबत मिलिंद जोशी, कल्याणी चौधरी, विद्या सावळे, शिवराज नाळे आणि अजय तपकिरे यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. साध्या कथेवर आधारित असूनही या मालिकेने प्रेक्षकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली.
मालिकेच्या शेवटानंतर अभिनेता अजय तपकिरे यांनी एक भावनिक पोस्ट शेअर करत लिहिलं, “दीड-दोन वर्षांचा प्रवास काल अखेर संपला… गुडबाय ‘कॉन्स्टेबल मंजू’.” यासोबत त्यांनी “सोडूनी गोकुळास बा रे, चाललास जा रे…” हे गाणं शेअर करून चाहत्यांना अधिक भावूक केलं.
हे पण वाचा.. स्पृहा जोशी झाली मावशी; भाच्याचं नाव जाहीर करत खास पोस्ट Spruha Joshi
विशेष म्हणजे, ‘कॉन्स्टेबल मंजू’ टीआरपीच्या टॉप शर्यतीत नसतानाही प्रेक्षकांनी मालिकेला भरभरून प्रेम दिलं. म्हणूनच ही मालिका बंद होत असल्याचं समजताच सोशल मीडियावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. “प्लीज मालिका बंद करू नका”, “अचानक शेवट का केला?”, “मनजूची कथा पुढे नेणे गरजेचे होते” अशा असंख्य कमेंट्स चाहत्यांनी नोंदवल्या आहेत.
दरम्यान, ही मालिका सन मराठी वाहिनीवर रात्री आठ वाजता प्रसारित होत असे. साध्या पण वास्तववादी कथेमुळे ती प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली होती. आता या मालिकेच्या आठवणीच चाहत्यांसोबत राहणार आहेत.









