‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका ‘अबोली’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या चार वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होती, मात्र आता तिचा शेवटचा टप्पा जवळ आला आहे. मालिकेचं शूटिंग पूर्ण झालं असून संपूर्ण टीमनं नुकतीच Wrap Up पार्टी साजरी केली आहे. या कार्यक्रमात मालिकेतील कलाकार, तंत्रज्ञ आणि टीममधील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन आनंदाचे क्षण साजरे केले.
‘अबोली’ ही मालिका २३ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सुरुवातीपासूनच कथानक, दमदार अभिनय आणि नात्यांमधील भावनिक गुंतागुंत यामुळे या मालिकेनं प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन केलं. विशेष म्हणजे, ही मालिका रात्री उशिराच्या स्लॉटमध्ये प्रसारित होत असूनही उत्तम टीआरपी मिळवण्यात यशस्वी ठरली.
गौरी कुलकर्णी आणि सचित पाटील या जोडीने मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या असून त्यांच्या नैसर्गिक अभिनयामुळे प्रेक्षकांना या पात्रांशी एक वेगळं नातं निर्माण झालं. त्यांच्यासोबत रेशम टिपणीस, रसिका धामणकर, माधव देवचक्के, कोमल कुंभार आणि मयुरी वाघ यांसारखे अनुभवी कलाकार मालिकेचा भाग होते. त्यांच्या अभिनयामुळे ‘अबोली’च्या प्रत्येक भागाला वेगळं वजन मिळालं.
अलीकडेच तन्मय जंगम या सेलिब्रिटी स्टायलिस्टनं सोशल मीडियावर Wrap Up पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओंमध्ये संपूर्ण टीम एकत्र येऊन मालिकेचा अंतिम भाग पाहताना भावनिक होताना दिसते. चार वर्षांचा प्रवास संपताना कलाकारांच्या डोळ्यातून आनंदाश्रूही झळकले.
स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या २७ ऑक्टोबरपासून नवीन मालिका ‘काजळमाया’ सुरू होत आहे. त्यामुळे वाहिनीवरील स्लॉट बदल करण्यात आले आहेत. रात्री ११ वाजता प्रसारित होणाऱ्या ‘अबोली’ मालिकेच्या जागी आता इतर मालिका दाखवली जाणार आहे. प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलेल्या ‘अबोली’ मालिकेचा हा शेवट निश्चितच भावनिक ठरणार आहे. गेल्या काही वर्षांत या मालिकेने असंख्य घरांमध्ये आपलेपणा निर्माण केला आणि त्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम राहणार आहेत. त्यामुळे ‘Aboli Serial End’ या बातमीने मालिकेच्या चाहत्यांना नक्कीच भावनिक केलं आहे.









