tarini malika khari olakh khandekar samor twist : झी मराठीवरील ‘तारिणी’ मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चेत आहे. वेगळ्या कथानकामुळे आणि रहस्य, भावना तसेच अॅक्शनचा उत्तम मिलाफ असल्याने या मालिकेने अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे तारिणी आणि केदार यांच्यातील नातं दिवसेंदिवस अधिक घट्ट होत असल्याचं कथानकातून पाहायला मिळत आहे. त्यांच्या आयुष्यातील भावनिक क्षणांसोबतच आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार असल्याचे नव्या प्रोमोमधून स्पष्ट झाले आहे.
काही दिवसांपूर्वी तारिणीने केदारसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर केदारनेही आपल्या मनातील भावना व्यक्त करत, तो ज्या मुलीवर प्रेम करतो ती दुसरी कोणी नसून तारिणीच असल्याचं सांगितलं. या प्रसंगानंतर त्यांच्या नात्याला नवं वळण मिळालं असून प्रेक्षकांकडून या जोडीवर भरभरून प्रेम व्यक्त केलं जात आहे.
मात्र या प्रेमकथेबरोबरच दोघांचं आणखी एक मोठं गुपित अद्याप त्यांच्या कुटुंबीयांपासून लपलेलं आहे. तारिणी आणि केदार हे स्पेशल क्राइम युनिटमध्ये कार्यरत असून अत्यंत धोकादायक गुन्ह्यांचा तपास करण्याची जबाबदारी ते पार पाडतात. त्यांच्या कामाचं स्वरूप गुप्त असल्यामुळे त्यांनी ही ओळख घरच्यांपासून लपवून ठेवली आहे. कुटुंबीयांच्या माहितीनुसार तारिणी एका स्वयंसेवी संस्थेत काम करते.
दरम्यान, मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने खांडेकर कुटुंबातील महिला एकत्र आल्याचं पाहायला मिळतं. त्याचवेळी काही चोरटे तेथे येऊन तारिणीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळण्याचा प्रयत्न करतात. मात्र तारिणी क्षणाचाही विलंब न करता त्यांचा पाठलाग सुरू करते. चोरांच्या दुचाकीला ती आपल्या ताकदीने रोखण्याचा प्रयत्न करते आणि त्यांच्या हातातून मंगळसूत्र परत मिळवण्यासाठी जीवाची बाजी लावते.
या प्रसंगात ती, “हे माझ्या आईचं मंगळसूत्र आहे, ते सोडा,” असे म्हणत चोरांशी थेट भिडताना दिसते. तिचं धाडस, आत्मविश्वास आणि असामान्य ताकद पाहून खांडेकर कुटुंबातील सर्व सदस्य थक्क होतात. त्यामुळे तारिणीची खरी ओळख आता सर्वांसमोर येणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
tarini malika khari olakh khandekar samor twist
झी मराठीने सोशल मीडियावर हा प्रोमो शेअर करत “तारिणीची खरी ओळख खांडेकरांसमोर येणार?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यानंतर चाहत्यांनीही विविध प्रतिक्रिया देत आगामी भागाबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे. अनेकांनी तारिणीच्या धाडसाचं कौतुक केलं असून काहींनी तिचं गुपित सर्वप्रथम कोणासमोर उघड होणार, याबाबत अंदाज व्यक्त केले आहेत.
हे पण वाचा.. १४०० हून अधिक भागांचा यशस्वी प्रवास संपणार! ‘मुरांबा’ मालिकेचा २८ जूनला होणार भावनिक निरोप
आता ‘तारिणी’ मालिकेच्या पुढील भागात हा थरार नेमका कोणत्या वळणावर जाईल, खांडेकर कुटुंबाला तिच्या खरी ओळखीचं सत्य समजेल का आणि या घटनेनंतर तारिणी व केदार यांच्या आयुष्यात कोणते नवे बदल घडतील, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.









