ADVERTISEMENT

शशांक केतकरचा संताप अनावर! “उघडं गटार म्हणजे मृत्यूचा सापळा”; प्रशासनाच्या निष्काळजीपणावर थेट सवाल

shashank ketkar open gutter video mumbai administration reaction : अभिनेता शशांक केतकरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमधून मुंबईतील उघड्या गटारांच्या समस्येकडे लक्ष वेधलं आहे. “माणसाचा जीव महत्त्वाचा आहे” असं म्हणत त्याने प्रशासनाला थेट जबाबदार धरत नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला.

shashank ketkar open gutter video mumbai administration reaction :  अभिनेता शशांक केतकर हा मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय चेहरा म्हणून ओळखला जातो. मालिकांमधील दमदार अभिनयासोबतच तो सामाजिक विषयांवर स्पष्ट मत मांडण्यासाठीही चर्चेत असतो. सध्या ‘मुरांबा’ मालिकेमधील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच, त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये शशांकने मुंबईतील एका उघड्या गटाराच्या समस्येवर संताप व्यक्त करत प्रशासनाला थेट सवाल केला आहे.

शशांकने आपल्या व्हिडीओत स्पष्ट शब्दांत सांगितले की, तो स्वतःला अभिमानी भारतीय आणि स्वाभिमानी हिंदू मानतो. मात्र देशावर प्रेम करणं म्हणजे चुका झाकून टाकणं नव्हे, असं त्याचं मत आहे. देश, राज्य किंवा शहरात जे काही चुकीचं घडतं, त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार असल्याचं तो म्हणाला. मतदान करून आपण लोकप्रतिनिधी निवडतो, त्यामुळे समस्या मांडणं ही नागरिक म्हणून आपली जबाबदारी असल्याचंही त्याने नमूद केलं.

या व्हिडीओमध्ये त्याने मुंबईतील मालाड परिसरातील मड आयलंडजवळील एका रस्त्यावर असलेल्या उघड्या गटाराचा मुद्दा मांडला. विशेष म्हणजे याच गटाराबाबत त्याने यापूर्वीही आवाज उठवला होता. त्यानंतर काही काळासाठी दुरुस्ती करण्यात आली होती आणि त्याबद्दल प्रशासनाचे आभार मानणारा व्हिडीओही त्याने शेअर केला होता. मात्र आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाल्याने त्याने नाराजी व्यक्त केली.

“एखादं छोटंसं गटार असलं तरी त्यातून एखाद्याचा जीव जाऊ शकतो,” असं म्हणत शशांकने प्रशासनाच्या दुर्लक्षावर टीका केली. ही जबाबदारी थेट पंतप्रधानांची नसून स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची आहे, असंही तो म्हणाला. कोणत्या विभागाच्या अखत्यारित ही कामं येतात, त्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नेमकं काय केलं पाहिजे, याचाही खुलासा व्हायला हवा, अशी मागणी त्याने केली.

व्हिडीओमध्ये त्याने प्रत्यक्ष त्या गटाराची स्थिती दाखवत ते किती धोकादायक आहे हेही सांगितलं. रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी हा प्रकार मोठा अपघात ठरू शकतो, अशी भीती त्याने व्यक्त केली. विशेषतः पावसाळ्याच्या काळात अशा उघड्या गटारांमुळे गंभीर दुर्घटना घडू शकतात, याकडेही त्याने लक्ष वेधलं

हे पण वाचा.. लग्नाशिवायही आयुष्य आनंदी होऊ शकतं; प्राजक्ता माळीच्या प्रश्नावर श्री श्री रविशंकर यांचं खास उत्तर

shashank ketkar open gutter video mumbai administration reaction

शशांक केतकरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अनेकांनी त्याच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर कलाकारांनी आवाज उठवणं गरजेचं असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून उमटताना दिसत आहेत.

हे पण वाचा.. माझी स्मृती परत आलीये…जान्हवीचा जयंतविरोधात मोठा डाव; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत वळण