Tanya Mittal Bigg Boss 19 : ‘बिग बॉस’चा प्रत्येक सीझन चर्चेत असतो आणि यंदाचा १९ वा सीझनही त्याला अपवाद नाही. विविध क्षेत्रातील नामवंत चेहरे, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि कलाकारांनी शोमध्ये पाऊल ठेवताच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या सगळ्यात एक स्पर्धक मात्र पहिल्याच दिवसापासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे — ती म्हणजे ग्वाल्हेरची उद्योजिका व इन्फ्लुएन्सर तान्या मित्तल. तिच्या बोलण्यापासून ते राहणीमानापर्यंत सर्व काही चर्चेत आहे.
तान्याने शोमध्ये प्रवेश करतानाच आपली ‘लक्झरी लाइफ’ उघडपणे मांडली होती. तिने सांगितलं होतं की ती ५०० पेक्षा जास्त साड्या, ५० किलो दागिने, स्वतःची चांदीची भांडी आणि बाटल्या घेऊन आली आहे. एवढंच नव्हे तर तिला कॉफी पिण्यासाठी खास आख्याला जावं लागतं आणि तिला आवडणारी बिस्किटं लंडनहून मागवली जातात, असंही ती म्हणाली होती. या वक्तव्यांनंतर सोशल मीडियावर तिची प्रचंड चर्चा रंगली. अनेकांनी तिच्या या दाव्यांवर विश्वास न ठेवता तिला ट्रोल केलं आणि तान्या खोटं बोलतेय, अशा प्रतिक्रिया उमटल्या.
आता या वादात शोमधीलच एक माजी स्पर्धक उतरला आहे. झीशान कादरी, जो काही दिवसांपूर्वी घराबाहेर पडला, त्यानं तान्याबद्दल आपलं मत मांडलं आहे. एका मुलाखतीदरम्यान झीशान म्हणाला, “लोक जेव्हा कोणावर बारीक लक्ष ठेवतात, तेव्हा कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं हे समजून घेतात. तान्या जे बोलते त्यावर बाहेर येऊन तिला उत्तर द्यावं लागणारच आहे.”
झीशानने पुढे सांगितलं की घरात असताना त्याचं आणि तान्याचं चांगलं बाँडिंग होतं. त्याला १०३ डिग्री ताप असताना तान्या आणि शहबाज यांनी त्याची काळजी घेतली होती. पण जेव्हा मालती चहर वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात आली, तेव्हा तान्याने झीशानला चिडवत “आता तुला नवीन बहीण मिळाली” असं म्हणत टोला लगावला होता. यावरून दोघांमध्ये बाचाबाचीही झाली होती.
झीशानने हेही सांगितलं की घरातून बाहेर पडताना तान्याने त्याला भेटलंच नाही, ज्याचं त्याला वाईट वाटलं. “मी तिला आधीच सांगितलं होतं की घरात जे काही बोलशील त्यावर तुला बाहेर उत्तर द्यावं लागेल. म्हणून स्पष्ट बोल,” असंही त्यानं स्पष्ट केलं.
तान्या मित्तलच्या लक्झरी लाइफबद्दलच्या वक्तव्यांमुळे तिच्यावर टीकास्त्रांचा मारा होत आहे. आता झीशान कादरीच्या प्रतिक्रियेनंतर या चर्चेला आणखी वाव मिळालाय. Bigg Boss 19 मध्ये पुढे तान्या मित्तल कशी प्रतिक्रिया देते आणि प्रेक्षकांची धारणा कशी बदलते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.









