मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता मनोरंजन विश्वातूनही आवाज मिळू लागला आहे. अभिनेता Riteish Deshmukh याने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर प्रतिक्रिया देत मराठा समाजाला न्याय मिळावा अशी आशा व्यक्त केली आहे.
मुंबईतील आझाद मैदानावर २९ ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील उपोषणावर बसले असून, त्यांच्यासोबत राज्यभरातून हजारो मराठा बांधव एकवटले आहेत. “आरक्षण मिळाल्याशिवाय आता मुंबई सोडणार नाही” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतल्यामुळे या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकारांपैकी एक असलेल्या Riteish Deshmukh ने सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर नेहमीच आपलं मत स्पष्टपणे मांडलं आहे. एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर पोस्ट शेअर करत त्याने आंदोलनकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. रितेश म्हणतो, “सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने मुंबईत जमले आहेत. या मागण्या पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप घरी परततील, अशी मनापासून इच्छा आहे. मनोज जरांगेजी हे उपोषणावर आहेत; त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि लवकरच समाधानकारक तोडगा निघावा ही अपेक्षा आहे. जय शिवराय, जय महाराष्ट्र.”
मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या या आंदोलनाला राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने लोक उपस्थित झाले आहेत. शेकडो वाहनं मुंबईकडे निघाल्यामुळे शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी वाढली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन सुरू असल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम जाणवत आहे. मात्र, Riteish Deshmukh याने केलेल्या पोस्टमुळे अनेक चाहते आणि मराठा समाजाचे लोक सोशल मीडियावर त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत.
हे पण वाचा.. मी खरंच नशीबवान! Adinath Kothare ने घेतलं लालबागचा राजाचं दर्शन; भक्तीत झाला तल्लीन
दरम्यान, रितेश देशमुख आपल्या अभिनयासोबतच सामाजिक भान ठेवणारा कलाकार म्हणून ओळखला जातो. तो नेहमीच संवेदनशील मुद्द्यांवर मतप्रदर्शन करत असतो. वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर त्याने दिग्दर्शित केलेला ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक चित्रपट २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या तो सिनेमाच्या तयारीत व्यस्त असला तरी सामाजिक चळवळींशी जोडलेला राहतोय.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात दिवसेंदिवस मोठ्या संख्येने लोक सहभागी होत आहेत आणि त्याला सर्वसामान्यांबरोबरच सेलिब्रिटींचंही समर्थन मिळत असल्याने या आंदोलनाची दखल घेणं राज्य सरकारसाठी अनिवार्य झालं आहे. रितेश देशमुखसारख्या लोकप्रिय कलाकाराने दिलेलं समर्थन मराठा समाजाच्या मागण्यांना नक्कीच बळकटी देणार आहे.
हे पण वाचा.. मी ठणठणीत आहे, चुकीच्या बातम्या पसरवू नका” – अभिनेता Mohan Joshi यांच स्पष्ट आवाहन..
Riteish Deshmukh ची पोस्ट
सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. श्री. मनोज जरांगे जी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो… pic.twitter.com/1lIELovdJC
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 29, 2025









