megha dhade supports mahesh kothare bjp remarks : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण आहे — तिचं स्पष्ट मत आणि महेश कोठारेंना दिलेला ठाम पाठिंबा. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक व अभिनेते महेश कोठारे यांनी भारतीय जनता पार्टीला (भाजप) जाहीर पाठिंबा दिल्यानंतर त्यांच्यावर टीकांची सरबत्ती सुरू झाली होती. मात्र आता मेघा धाडेने सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या बाजूने ठाम भूमिका घेतली आहे.
मेघाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, “जेव्हा अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उध्दव सेनेत गेली, तेव्हा भाजपच्या कोणत्याही प्रवक्त्याने तिच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नव्हतं. त्याचप्रमाणे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली, तरी कुणीही त्यावर आक्षेप घेतला नाही. मग आता महेश कोठारे यांनी मोदींचं कौतुक केल्यावर एवढी चिडचिड का?”
ती पुढे म्हणाली, “महेश कोठारे जे बोलले ते मनापासून बोलले. ना त्यांनी तिकीटाची लालसा ठेवली, ना कोणाचं पाकीट मिळवण्यासाठी ते असं बोलले. त्यांनी जे काही सांगितलं, ते एका सामान्य मुंबईकराचं खरं भावविश्व आहे.”
मेघाने कोठारेंच्या भाषणाचा संदर्भ देत म्हटलं की, “जो मुंबईकर आधी ट्रॅफिकमध्ये अडकायचा, तो आता अटल सेतूवरून सुसाट धावतोय. जो आधी रस्त्यावर धक्के खात मेट्रोची वाट पाहायचा, तो आज मेट्रोत आरामात प्रवास करतोय. ह्याच भावनांचं प्रगटीकरण कोठारेंच्या भाषणातून झालं आणि म्हणूनच काहींच्या पायाखालची जमीन सरकली.”
दरम्यान, दिवाळीनिमित्त भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमात महेश कोठारे म्हणाले होते की, “भाजप म्हणजे माझं घर आहे. मी मोदी भक्त आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या दिवाळीपर्यंत मुंबईत कमळ फुलेल.” या विधानानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि इतरांनी त्यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
हे पण वाचा.. बांदेकरांचा लेक सोहमने पूजा बिरारीच्या पोस्टवर केलेल्या कमेंट्समुळे चर्चांना मिळाली नवी दिशा!
मेघा धाडे मात्र ठामपणे म्हणते, “महेश कोठारेंनी काहीही चुकीचं बोललेलं नाही. त्यांनी केवळ सत्य मांडलं, आणि ते मनापासून.”
या विधानानंतर सोशल मीडियावर मेघाच्या पोस्टला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. काही जण तिच्या धाडसाचं कौतुक करत आहेत, तर काही जण तिच्या मताशी असहमत आहेत. मात्र एक गोष्ट निश्चित — मेघा धाडे नेहमीप्रमाणे आपल्या ठाम आणि स्पष्ट बोलण्याच्या स्वभावामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
हे पण वाचा.. सई ताम्हणकरचा स्पष्ट शब्दांत सवाल – “हिंदी इंडस्ट्रीत गेलं की महत्त्व वाढतं का?”









