lagnanantar hoilach prem grand revelation 16 december : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेची कथा सध्या एका निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. गेल्या काही भागांपासून वसु आत्या आणि रम्या काव्याचा भूतकाळ उघड करण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. सुनीताशी हातमिळवणी करून दोघींचं ‘मिशन काव्या’ जोरात सुरू होतं आणि अखेर त्या शोधत असलेला पुरावा त्यांना मिळाल्याचं स्पष्ट होतं. कॅफेमधला जीवा आणि काव्याचा जुना फोटो वसु आत्याच्या हाती लागताच संपूर्ण परिस्थितीचं चित्र पालटतं. इतक्या दिवसांपासून दडपून ठेवलेलं सत्य आता वर येणार हे निश्चित झालं आहे.
एका बाजूला मालिकेतील पार्थ-काव्या आणि जीवा-नंदिनी ही दोन्ही जोडपी मनाविरुद्ध झालेल्या लग्नानंतरही नातं टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. हळूहळू एकमेकांबद्दलचा विश्वास आणि प्रेम वाढताना दिसत असतानाच हा भूतकाळ त्यांच्या संबंधांवर सावली टाकणार आहे. देशमुखांच्या घरात सारे कशात गुंतलेले असताना गुरुजी अनपेक्षितपणे येऊन १६ डिसेंबरला काहीतरी अघटित घडणार असल्याचा इशारा देतात. त्याच वेळी वसु आत्या देखील हेच सत्य उघड करण्यासाठी १६ डिसेंबरची तारीख ठरवते. त्यामुळे आता मालिकेत काय गोंधळ उडणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.
वसु आत्याला मिळालेला फोटो फक्त एक पुरावा नाही, तर देशमुख कुटुंबाच्या सुखी आयुष्याला धक्का देणारी मोठी घटना ठरू शकते. रम्यानेही आईला विचारलेला “हे सर्वांसमोर कधी मांडायचं?” हा प्रश्नच जणू आगामी वादळाची चाहूल देतो. जीवा-काव्याच्या अफेअरचं गुपित एकदा समोर आलं की नंदिनी आणि पार्थ कोणता निर्णय घेतील, कुटुंबातील मानिनीची भूमिका काय असेल आणि जीवा-काव्याचं भविष्य कोणत्या दिशेने वळेल या प्रश्नांनी चाहत्यांचं कुतूहल चांगलंच वाढवलं आहे.
सध्या मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. “हे होणारच होतं”, “१६ तारखेची वाट पाहतोय”, “आता खरी एंट्री होणार ड्रामाची!” अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत. फक्त १७ दिवस उरले आहेत आणि त्या दिवशी ‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेला निर्णायक वळण मिळणार आहे, एवढं नक्की. देशमुख कुटुंबात येऊ घातलेला हा महाखुलासा पुढील भागात किती मोठा भूकंप घडवतो हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.









