hina khan cancer prerna anubhav : टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्री Hina Khan ने आपल्या धाडसाने आणि सकारात्मक विचारांनी लाखो लोकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील अक्षरा या भूमिकेमुळे ती घराघरात ओळखली जाऊ लागली. मात्र गेल्या वर्षी तिच्या आयुष्यात मोठा धक्का बसला, जेव्हा तिला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले. त्या क्षणापासून तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं, परंतु Hina Khan ने या संकटापुढे हार मानली नाही.
अलिकडेच तिने एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना तिच्या कर्करोगाच्या प्रवासाबद्दल खुलासा केला. हिना म्हणाली, “कर्करोग झाल्यानंतर अनेकांना वाटतं की आता आयुष्य संपलं, पण हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. काही दिवस कठीण असतात, पण त्या काळानंतर आपण पुन्हा उभं राहू शकतो. धैर्य, इच्छाशक्ती आणि कुटुंबाचं प्रेम या गोष्टीच खरी ताकद देतात.”
हिना पुढे म्हणाली की, “माझ्या आजारपणात माझ्या कुटुंबाने मला जी साथ दिली, त्यामुळं मी आज पुन्हा कॅमेऱ्यासमोर उभी आहे. माझं शरीर जिथपर्यंत साथ देईल तिथपर्यंत मी अभिनय करत राहणार आहे. मानसिक ताकद सर्वात महत्त्वाची असते, त्यामुळे नेहमी स्वतःला मजबूत ठेवा आणि आनंदी राहा.”
तिच्या या वक्तव्याने हजारो रुग्णांना नवा आत्मविश्वास मिळाला आहे. Hina Khan ने फक्त शब्दांनीच नव्हे तर कृतीतूनही हे दाखवून दिलं आहे. काही दिवसांपूर्वी उपचार सुरू असतानाच तिने रुग्णालयात स्वतःचा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती हसतमुख दिसत होती. त्या पोस्टसोबत तिने लिहिलं होतं, “ही ती मुलगी आहे जी काहीही झालं तरी हसते. परिस्थिती कोणतीही असो, आनंदी राहणं हेच आयुष्याचं गमक आहे.”
हिनाने गेल्या वर्षी जूनमध्ये तिच्या आजाराची माहिती इन्स्टाग्रामवर शेअर करत सांगितलं होतं की, तिला तिसऱ्या टप्प्यातील ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. पण ती पूर्ण तयारीने या आजाराशी लढणार आहे. त्या वेळी तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरून तिला प्रचंड पाठिंबा दिला होता.
हे पण वाचा.. बिग बॉस १९’वर अरमान मलिकचा खुलासा: “हा शो खूप टॉक्झिक आहे, भाऊ अमालला चुकीचं दाखवलं जातंय”
सध्या Hina Khan प्रकृतीने सुधारत असून पुन्हा कामात सक्रिय झाली आहे. ती पती रॉकी जयस्वालसोबत ‘पती पत्नी और पंगा’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे. तिच्या या जिद्दी वृत्तीने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने ती अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे.
Hina Khan च्या या कहाणीने पुन्हा एकदा सिद्ध केलं की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनाने मजबूत राहिलं तर कोणतंही आव्हान पेलता येतं.
हे पण वाचा.. मराठी-हिंदी चित्रपटांची चमक गायब झाली – संध्या शांताराम यांचे निधन









