bigg boss marathi 6 pahile nomination sagar tanvi vad : बिग बॉस मराठी ६ च्या घरात अवघ्या काही दिवसांतच नाट्याला जोरदार सुरुवात झाली आहे. तिसऱ्या दिवशी पार पडलेल्या पहिल्या नॉमिनेशन प्रक्रियेमुळे घरातील शांतता अचानक भंगली असून, सदस्यांमधील नातेसंबंध झपाट्याने बदलताना दिसत आहेत. नुकताच समोर आलेला प्रोमो पाहता, या सीझनमध्ये वाद-विवाद आणि आक्रमक भूमिका यांची कमी राहणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.
या प्रोमोमध्ये सागर कारंडे आणि तन्वी कोलते यांच्यातील टोकाचा संघर्ष सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. नॉमिनेशन टास्कदरम्यान तन्वीने सागर कारंडेचा फोटो असलेली पतंग कापल्याचं पाहायला मिळतं. केवळ इतकंच नाही, तर तिने थेट “सागर कारंडे या शोसाठी अपात्र आहेत” असं विधान केल्यामुळे घरात खळबळ उडाली. तिच्या या वक्तव्याने सागर प्रचंड संतापलेला दिसतो आणि दोघांमध्ये शाब्दिक चकमक रंगते.
तन्वीच्या आरोपांना उत्तर देताना सागर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करतो. “आपण काय बोलतोय याचं भान तरी असावं,” असं तो म्हणतो. मात्र, तन्वीही मागे हटताना दिसत नाही. उलट, ती अधिक आक्रमक होत “मी नॉनसेन्स आहे, तुम्ही बोलायची गरज नाही,” असं ठणकावून सांगते. यानंतर सागर रागाच्या भरात तिला मध्ये बोलू नकोस, असं बजावतो. यावर तन्वीचा सूर आणखी चढतो आणि “मी तुझ्या आवाजाला घाबरत नाही, तू मला शिकवणार?” असं सडेतोड उत्तर ती देते.
नेहमी संयमी आणि शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा सागर आणि थेट भूमिका घेणारी तन्वी यांच्यातील हा वाद Bigg Boss Marathi 6 च्या घराला कोणत्या दिशेने नेणार, याचीच चर्चा सध्या रंगली आहे. नॉमिनेशनची भीती, खेळात टिकून राहण्याचा दबाव आणि स्वतःची बाजू ठामपणे मांडण्याची धडपड यामुळेच हे संघर्ष वाढत आहेत का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
दरम्यान, हा प्रोमो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. अनेक नेटकऱ्यांनी सागर कारंडेच्या बाजूने उघडपणे पाठिंबा दर्शवला असून, तन्वीच्या वागणुकीवर टीकाही केली आहे. काहींनी तिला आदराने बोलण्याचा सल्ला दिला, तर काहींनी सागरचा अनुभव आणि इंडस्ट्रीतील स्थान अधोरेखित केलं.
हे पण वाचा.. Bigg Boss Marathi 6 मध्ये पॉवर Key मुळे तिसऱ्या दिवशी मोठा गोंधळ, रुचिताचं स्वप्न धोक्यात?
आज, १४ जानेवारी रोजी प्रसारित होणाऱ्या भागात Bigg Boss Marathi 6 चं पहिलं नॉमिनेशन नेमकं कसं पार पडतं आणि या वादाचा खेळावर काय परिणाम होतो, हे पाहणं प्रेक्षकांसाठी निश्चितच उत्सुकतेचं ठरणार आहे. शो दररोज रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येतो.
हे पण वाचा.. मकरसंक्रांतीला ‘तिळगूळ मोमोज’चा गोड प्रयोग; संजय जाधव आणि लेकीचा व्हिडीओ चर्चेत









